मुंबई : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे आणि भाजप गटातील प्रत्येकी ९-९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असं काल परवाच तुम्ही सर्वजण विचारत होता. आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. सर्व मंत्री आपआपल्या विभागाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडतील. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करतील. तसेच, सर्व मंत्री आपआपल्या विभागाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचं काम करतील. एक चांगलं काम एक गतीमान सरकार सर्वसामान्यांचं सरकार अशा प्रकारचे काम आमच्या मंत्र्यांकडून होईल. शिवसेना भाजप युतीचं सरकार लोकाभिमुख काम करेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.