नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी यश संपादन केले. राज्यातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर याने भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 61 पदके पटकावली, ज्यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण 7 खेळाडूंनी पदके जिंकली असून त्यांना महाराष्ट्र सरकारने मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
राज्यातील या पदकविजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने आधी जाहीर केलेल्या रकमेत मोठी वाढ केली आहे. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रथम 12 लाख 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आता त्यातवाढ करून थेट 50 लाख एवढे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांची बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली.