मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झाले. परंतु, अशातच या अपघातावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विनायक मेटेंचा अपघात आहे की घातपात, अशी शंका व्यक्त करत या घटनेच्या चौकशीची मागणी सावंत यांनी केली आहे. विनायक मेटे यांचा अचानक अपघाती मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यामध्ये नुकतीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राज्यामध्ये सत्तांतर झालं. मात्र, एवढी मोठी घडामोड होऊनही विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी या सर्व प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. याबाबत त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. अचानक काल त्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आले, कोणी बोलावले होते? कशासाठी याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.