नवी दिल्ली: सध्या देशात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाचे छापासत्र सुरू आहे. ईडीला अशा कारवाईत संबंधित आरोपीच्या घराची झडती तसेच तपासात सापडलेला किमती ऐवज जप्त करण्याचा अधिकार असतो.
पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरातही ईडीने छापे टाकून ५० कोटींहून अधिक किमतीचा ऐवज जप्त केला. त्यात सोने, चांदी आणि अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी, बडे नेते तसेच उद्योगपतींच्या घरी ईडीने कारवाई करून लाखोंची संपत्ती जप्त केली आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या घरी १९९७ ला प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. त्यात जप्त केलेला ऐवज -
- सोने - २९ किलो
- चांदी - ८०० किलो
- साड्या - ११,०००
- सुवर्णजडित रेशमी
- साड्या - ७५०
- शाली - २५०
- महागडी घड्याळे - ९१
-चपला व सँडल - ७५०
६७ कोटी - एकूण किंमत
प्राप्तिकर विभागाने हे सामान २००२ साली सरकारकडे जमा केले. नंतर हा खटला तामिळनाडूतून कर्नाटकमध्ये हलविण्यात आला आता बंगळुरूच्या शहर सिव्हिल कोर्टाच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हे किमती सामान ठेवलेले आहे. हा ऐवज सुरक्षित राहावा यासाठी तिथे २४ तास चार पोलीस तैनात असतात.
५ डिसेंबर २०१६ रोजी जे. जयललिता यांच्या निधनानंतर ही सर्व अवैध संपत्ती राष्ट्रीय धन म्हणून घोषित करण्यात आली. गेली २६ वर्षे हा किमती ऐवज पडून आहे. याचा लिलाव करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
दरम्यान, लिलाव करण्याआधी वस्तूची एकूण स्थिती पाहून तिचे किमान मूल्य निश्चित केले जाते. त्यानंतर लिलावासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ठिकाण, तारीख आणि वेळ याची माहिती दिली जाते.(सौ. लोकमत)