मुंबई: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून एकामागून एक वाद वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. आता सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून सातत्याने होत असलेल्या टीकेचा समाचार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
हॅलो शब्द १८ व्या शतकात आला. आश्चर्य व्यक्त करणे असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजांची ही आठवण पुसून काढली पाहिजे. आपल्या मराठी पुस्तकात वंदे मातरमचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षा देशभक्ताच्या ओठातून निघालेले वंदे मातरम् प्राणप्रिय आहे, असे मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले.
तसेच ते पुढे म्हणाले, शिवसेनेकडे जी खाती होती ती त्यांच्याकडे आहेत. भाजपने चांगली खाती घेतली असे म्हणण्याला काही अर्थ नाही. भाजपाकडे जी खाती आहेत, ती शिवसेनेने विचारपूर्वक, चिंतन करुन काँग्रेस, राष्ट्रवादीला दिलेली खाती आहेत. तेव्हा तेही सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत होते आणि सध्या आम्ही आहोत. शिवसेनेने यावर टीका करणे म्हणजे आपल्याकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही म्हणत निंदा करुन घेण्यासारखे आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली.