सांगली: गेल्या दोन पासून सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांत पाणी साठा वाढला आहे. तसेच, नदी, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम भागात शनिवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम भागात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तसेच, धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी कोकरूड रेठरे बंधारा पाण्याखाली गेला.
दरम्यान, आज वारणा धरणात (28.78 TMC) टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असून धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. तरी नदीकाठच्या गावांना व ग्रामस्थांना दक्षतेचे आदेश देण्यात आलेले आहेत