मुंबई: शिंदे-राणेच्या बंडाशी माझ्या बंडाची तुलना करु नका, मी गद्दारी करुन पाठीत खंजीर खूपसून बाहेर पडलो नाही, तर बाळासाहेबांना सांगून मी पक्षातून बाहेर पडलो असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्टिव्ह झाले असून त्यांनी आज दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्यातील भाषणामध्ये राज ठाकरे म्हणाले, 'मनसेने एकही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही. मनसेच्या आंदोलनांमुळे अनेक टोलनाके बंद झाले, इतर पक्षांनी आश्वासन देऊनही टोल बंद केले नाहीत, मात्र ते मनसेने बंद केले. मशिदींवरील भोंग्याचं आंदोलन हातात घेतलं, तर ९२ ते ९३ ठिकाणचे सकाळी वाजणारे भोंगे बंद झाल्याचा आकडा पोलिसांनी दिला असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले.