नवी दिल्ली - सीबीआयचे पथक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले आहे.सीबीआयकडून सध्या एकाच वेळी २० ठिकाणी छापमारी करण्यात येत आहे. मनीष सिसोदिया यांनीही ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ट्विट करत मनिष सिसोदिया म्हणले की, सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नाही.
दरम्यान, सीबीआयची ही कारवाई दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. वास्तविक, अलीकडेच दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. हा अहवाल ८ जुलै रोजी एलजीला पाठवण्यात आला होता.मुख्य सचिवांच्या अहवालानंतर एलजी व्हीके सक्सेना यांनी हे पाऊल उचलले आहे. या अहवालातील मनीष सिसोदिया यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.नव्या धोरणामुळे दिल्ली उत्पादन शुल्क कायदा आणि दिल्ली उत्पादन शुल्क नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय, दारू विक्रेत्यांचे परवाना शुल्क माफ केल्यामुळे सरकारचे 144 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.