आटपाडी: दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. ऑगस्ट महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 'गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करत आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस भाद्रपद महिन्यात येतात. हे जाणून घेणार आहोत.
1979 : भारतीय गायक , गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म
युवन शंकर राजा यांचा जन्म ऑगस्ट 31 1979 रोजी चेन्नई, तमिळनाडू येथे झाला. ते एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय तमिळ संगीतकार,पार्श्वसंगीतकार,गीतकार व गायक आहेत. तसेच ते प्रसिद्ध संगीतकार इळैयराजा यांचे चिरंजीव आहेत. लहानपणापासूनच संगीताची पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी संगीताच्या कारकिर्दीस प्रारंभ केला.
1969 : भारतीय जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म
जवागल श्रीनाथ भारताचे उत्कृष्ट जलदगती गोलंदाज होते. त्यांनी फिरकीपटू गोलंदाजांचा बोलबाला असणाऱ्या भारतीय संघात जलदगती गोलंदाज म्हणून जागा मिळवून आपली प्रतिभा मिळवली. कर्नाटकाच्या या जलद गोलंदाजाने जवळपास एक दशक भारतीय जलद गोलंदाजीचं नेतृत्व केलं.
श्रीनाथ यांनी 67 कसोटी सामन्यात 236 विकेट्स घेतल्या. भारताचा मुख्य जलदगती गोलंदाज होण्यासोबतच त्यांनी कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात उत्तुंग यश प्राप्त केलं. करिअरच्या शेवटच्या 33 कसोटी सामन्यात 30 पेक्षा कमी सरासरीने 118 विकेट्स घेतल्या. यात त्याचं एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स म्हणजे 132 धावा देऊन 13 विकेट्स घेतल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. 2002 मध्ये त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना खेळला आणि 2003 मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
1963 : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म
ऋतुपर्णो घोष यांचा जन्म 31 ऑगस्ट 1963 रोजी झाला. ते बंगाली चित्रपट दिग्दर्शक होते. अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी जाहिरात एजन्सीमध्ये सर्जनशील कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1994 मध्ये त्यांचा 'हीर अंगती' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी पडद्यावर आलेल्या युनिशे एप्रिल या त्यांच्या पुढच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुमारे दोन दशकांच्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांना एकूण 12 राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 30 मे 2013 रोजी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
1940 : मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्मदिवश
मराठी कादंबरीकार, मृत्यूंजयकार आणि मराठी साहित्य विश्वात इतिहास घडवणारे दिवंगत साहित्यिक शिवाजी गोविंदराव सावंत यांची आज जयंती. ‘मृत्यूंजयकार’ यासाठी की त्यांची ‘मृत्यूंजय’ कादंबरी साहित्यात विशेष अग्रस्थानी आहे. महाभारतातील योध्दा कर्णच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी आहे. 1967 साली लिहिली गेलेली ‘मृत्यूंजय’ कादंबरी आजही लाखो तरुणांच्या हृद्यात कायमची वसली आहे. त्यांच्या छावा, युगंधर या कांदबऱ्याही विशेष गाजल्या. त्यांच्या छावा आणि मृत्यूंजय कादंबरीवर मराठी नाटकंही रंगभूमीवर आपल्याला पहायला मिळतात. कोल्हापुरातील आजरा गावात 31 ऑगस्ट 1940 साली शिवाजी सावंत यांचा जन्म झाला.
1944 : वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड यांचा जन्म
1931 : पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म
1919 : पंजाबी लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म
1907 : फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म
1902 : रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कसकार मालक दामू धोत्रे यांचा जन्म
1870 : इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचा जन्म
2020 : भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन
2012 : भारतीय राजकारणी काशीराम राणा यांचे निधन
1995 : खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचे निधन
1973 : शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्याताराबाई मोडक यांजे निधन
महत्वाच्या घटना
1997 : प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले
1996 : पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
1991 : किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
1971 : अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
1970 : राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
1962 : त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
1957 : मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
1947: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
1920 : खिलाफत चळवळीची सुरुवात.(सौ. abp माझा)