मुंबई : लोकशाही व संविधानाच्या तत्वांवर देशात आजपर्यंत सरकारे काम करत होती. परंतु २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हुकूशाही पद्धतीने काम करत आहे. २०१४ पासूनच देशात आणीबाणी सुरू असून विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी व विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजप ईडी, सीबीआय, आयकर यांसारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे, असा थेट हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
तसेच, देशातील विरोधक संपवण्याचे काम भाजप करत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या मनीष सिसोदिया, तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराच्या घरावर सीबीआयने टाकलेले छापे हेच दाखवतात. सीबीआय, ईडी, आयकर या यंत्रणांचा राजकीय इप्सित साधण्यासाठी भाजप गैरवापर करत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले म्हणाले, “भाजप हा फोडा व राज्य करा या इंग्रजांच्या नितीप्रमाणे राजकारण करत आहे. जे नेते वा राजकीय पक्ष भाजपला साथ देत नाहीत, त्यांच्या घरांवर सीबीआय, ईडीची कारवाई केली जात आहे, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.