नवी दिल्ली : आशिया चषकातील चूक पुन्हा T-20 विश्वचषकात होऊ नये, यासाठी भारतीय क्रिकेट संघ खबरदारी घेताना दिसत आहे. यासाठी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, कोणत्या खेळाडूला गाळलं जाणार, याच्याही चर्चा सध्या रंगल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघानं आशिया चषकात काही खेळाडूंना संधी न देऊन मोठी चूक केली होती, ती चूक आता सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आशिया चषकातील एका चुकीबद्दल बोलायचं झाल्यास आशिया चषकासाठी निवडलेल्या संघात स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी न देऊन भारतीय संघानं मोठी चूक केली होती. तसेच, भारताला यंदाचा टी-20 विश्वचषक जिंकायचा असेल तर ऋषभ पंतला वगळावं लागेल, असंही काही क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मत व्यक्त करत आहेत. त्यामुळे टी-20 विश्वचषकात ऋषभ पंतला टीम इंडियातून वगळून संजू सॅमसनला संधी द्यावी लागणार आहे. ऋषभ पंतचा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पण टी-20 क्रिकेटमध्ये तो संजू सॅमसनसारखा प्रभावी खेळाडू म्हणून दिसला नाही, त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून आहे.