पुणे: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील ज्या शाळांमधील पटसंख्या ही वीसहून कमी आहे, त्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस, कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांनी विरोध केला आहे.
जयराज लांडगे म्हणाले, राज्यातील सरकारी शाळा एकेकाळी दर्जेदार होत्या. या शाळा जाणीवपूर्वक बंद पाडण्याचा डाव आहे. याला खासगी शाळांच्या संस्थाचालकांची फूस आहे. आता ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. मुळात ग्रामीण भागात इंटरनॅशनल स्कूलचे नवे फॅड आले आहे. या शाळांचे अर्थकारण सुरळीत चालण्यासाठीच राज्य सरकार वीसहून कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करीत आहे का?, राज्यातील एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, उलट या मराठी शाळा दर्जेदारपणे चालविल्या पाहिजेत. त्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारच्या या धोरणाचा विरोध करेल, असा इशाराही लांडगे यांनी दिला आहे.