मुंबई: राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोकरीसाठी लाभ मिळावा म्हणून गुणांकन कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
दरम्यान, गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.