मुंबई :शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली, तसेच जेव्हा नारायण राणे हे शिवसेना सोडून चालले होते, तेव्हा रामदास कदम यांनी त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्काम केला होता. राणे गटात या असं शिवसैनिकांना सांगण्यात कदम हे आघाडीवर होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, रामदास कदम यांनी शिवसेना आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते नुसतेच आम्हाला खोके सरकार आणि गद्दार म्हणतात, पण त्याऐवजी त्यांनी गेल्या अडीच वर्षात काय केलं ते जनतेला सांगावे असं कदम यांनी म्हटलं होतं. कदम यांच्या या टीकेला आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.