नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीतील प्रभाग पद्धतीला विरोध केला आहे. तीनचा प्रभाग, चारचा प्रभाग हे लोकशाहीला घातक आहे. एक नगरसेवक निवडून दिला त्यानं काम करावं. चार नगरसेवकांना लोकांनी कसं लक्षात ठेवावं? लोकांकडे या नगरसेवकांनी कसं जावं? वॉर्ड पद्धतीनेच मनपाच्या निवडणुका व्हायला हव्यात. एकट्या प्रभागात आपण एका नगरसेवकाला जबाबदार धरू शकता.
एकच्या प्रभाग पद्धतीची आम्ही आधीच मागणी केलीय. आम्ही त्यासाठी न्यायालयात गेलो आहे. जगात असं कुठेच होत नाही. ते महाराष्ट्रात कसं होतं? असा सवाल करतानाच ज्यांचं सरकार आलं ते प्रभाग दोनचा की चारचा हे ठरवणार का? मग निवडणूक आयोगाचं काम काय? ते काय फक्त कार्ड काढणार?, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारण्यात आलं. त्यावर शेतकरी आत्महत्येबाबत मामा फडणवीस यांना विचारा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.(सौ. TV9 मराठी)