अहमदनगर : सध्या वेदांत प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आता याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता, रोहित पवार यांनी या प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, “वेदांता प्रकल्पाला महाविकास आघाडीने तळेगाव येथे जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना ती जागा आवडली देखील होती. त्यांना सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र तरीही प्रकल्प गुजरातला गेला. मात्र गुजरातमध्ये त्यांना जी जागा प्रकल्पासाठी देण्यात आली आहे, ती जागा त्यांना आवडलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.