मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढत्या महागाई आणि घरगुती वापराच्या गॅसवर आलेल्या बंधनावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
ऐन नवरात्रौत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी मोदीसरकारने गृहिणींच्या चिंतेत आणखी भर घालण्याचं काम केले आहे. एकीकडे एलपीजी गॅस सिलेंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलेंडर वापरावर मर्यादा आणायची, यातून केंद्रसरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून येते, असा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केला आहे.
तसेच, देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपसरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर, सण – उत्सव साजरे करण्यावर आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. आता सण उत्सव बंधणं घालूनच साजरे करावे लागणार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.