आटपाडी: बहुपयोगी अशा नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हटलं जातं. नारळाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जागतिक नारळ दिनाचा इतिहास:
जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला. APCC च्या स्थापनेसाठी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. ही एक आंतर-सरकारी संस्था आहे जी नारळाचे उत्पादन करणाऱ्या आशियाई-पॅसिफिक राज्यांवर देखरेख आणि सुविधा देते. 2009 हे नारळ दिवस साजरा करण्याची सुरुवात होती. तेव्हापासून दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.
महत्त्व:
जागतिक नारळ दिन साजरा करण्याचे मुख्य महत्त्व म्हणजे एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ची स्थापना लक्षात ठेवणे. या दिवशी समाज नारळाचे महत्त्व आणि फायदे विविध स्वरूपात साजरे करतो. हा दिवस खास बनवण्यासाठी नारळ पाणी, खोबरेल तेल, दूध आणि भुसाला विशेष महत्त्व आहे.
फायदे:
नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते. तसेच नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो. नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. नारळाचे पाणी रोज प्यायल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहते.
अगदी तहान भागविण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत. नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. म्हणूनच आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे.
दरम्यान, जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतलं जातं.