परभणी : परभणीच्या दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सकाळच्या प्रहरी दौऱ्यावर येत असतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून नुकसानभरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला. यावर ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, तो शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही. नुकसानभरापाईची घोषणा झाली आहे आता अंमलबजावणीही होणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
यंदा आर्थिक मदतीचे निकष बदलले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणार आहे. शिवाय पंचनामे आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे मदत ही दिली जाणारच आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंब होत असला तरी शेतकऱ्यांनी त्याबाबत चिंता करु नये असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. तसेच, पंचनामे करताना काही चूक झाली का? याची देखील तपासणी केली जाणार आहे. शिवाय केवळ अधिकारीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले असे नाही तर आपणही शेतकऱ्यांशी संवाद साधून नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा घेणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली म्हणजे त्याची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भलेही उशिर होत असला तरी हा मदत लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न राहिल असेही कृषीमंत्री म्हणाले आहेत.