पुणे : दोन वर्ष कोविडचे निर्बंध होते, म्हणूनच आपण आज सण साजरे करू शकतो. जर निर्बंध नसते तर उत्तर प्रदेशात जे घडले तेच इकडे घडले असते. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे मत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या अशा प्रसंगी राजकारणावर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेले अनेक महिने महापालिकांवर प्रशासक आहे. निवडणुका होणे गरजेचे आहे. वेगवेगळे प्रश्न उद्भवत असतात. मंत्र्यांना बंगले मिळाले आहेत, मात्र पदभार अद्याप घेतला गेला नाही. पालकमंत्रीदेखील अजून कुठलेही घोषित झालेले नाहीत. पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे असते, जिल्ह्यासाठी गरजेचे असते. त्यामुळे ते घोषित व्हावे, अशी मागणी त्यांनी या निमित्ताने केली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे हे पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी पुण्यातील गणेशोत्सव अनुभवला.