वर्धा: मांडवा गावातील असलेल्या मोती नाल्यावर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.या घटनेत दोन बालकांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तिसरा व्यक्तीही बुडाला आहे. तिघांचेही मृतदेह नाल्याबाहेर काढलेत. या घटनेने मांडवा गावावर शोककळा पसरली. कार्तिक बलवीर वय 14, अथर्व वंजारी वय 12, संदीप चव्हाण वय 35 सर्व राहणार मांडवा, अशी मृतांची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृतक बालके हे त्यांच्या कुटुंबासह मांडवा परिसरात असलेल्या मोती नाल्यावर गणपती विसर्जना करिता गेले होते. गणपती विसर्जनादरम्यान नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने कार्तिक बलवीर आणि अथर्व वंजारी हे दोघेही पाण्यात बुडाले आणि पाण्यातील चिखलात जाऊन फसले. ही बाब संदीप चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी बालकांना वाचवण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारली. मात्र, संदीप देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
दरम्यान, संदीप चव्हाण यांच्यासोबत आलेली युवती अंजली चव्हाण हिने मांडवा गावात जात ही बाब संपूर्ण गावात आरडाओरड करीत सांगितली. गावकऱ्यांनी नाल्यातील पाण्यात उडी मारून बालकांचा शोध घेतला. मात्र तिघांचेही मृतदेह हाती लागले. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलेत