नवी दिल्ली: सध्याच्या युगात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता आधारकार्डशी तुमचे रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही कागदपत्रेही लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्डची गरज वाढल्याने त्याचा गैरवापरही होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार लोकांच्या आधारचा गैरवापर करून केवळ आर्थिक फसवणूक करत नाहीत तर काही गुन्हेगारी कृत्यांमध्येही त्याचा वापर करत आहेत. ही प्रकरणे वापरकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.
आधार सुरक्षित ठेवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या:
आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल त्याच्याशी लिंक करणे. हे केल्यास तुम्हाला वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी आवश्यक येणार आहे. ते आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येईल. OTP शिवाय आधारची पडताळणी करता येत नाही. अशा प्रकारे आधारचा गैरवापर टाळता येईल. आधार कार्डची कॉपी देणे आवश्यक असल्यास मास्कड आधारकार्डची छायाप्रत द्यावी लागणार आहे. मास्क केलेल्या आधारमध्ये संपूर्ण आधार क्रमांक नसून फक्त शेवटचे चार अंक असतात. याच्या मदतीने आधार पडताळणी केली जाते.
तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करून तुमचे आधार सुरक्षित करू शकता. बायोमेट्रिक लॉक म्हणजे अंगठांचे ठसे तुमच्या इच्छेविरुद्ध कोणीही वापरू शकत नाही. UIDAI वेबसाइटला भेट देऊन कोणीही त्यांचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकतात. बायोमेट्रिक्स लॉक झाल्यानंतरही ओटीपी आधारित प्रमाणीकरण सुरू राहते. बायोमेट्रिक्स तात्पुरते किंवा कायमचे लॉक केले जाऊ शकतात.
आधार क्रमांक व्हर्च्युअल आयडेंटिटी मध्ये लपविला जातो आणि तात्पुरता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो. यामध्ये वापरकर्त्याचा आधार क्रमांक जाहीर केला नसला तरी त्याची ओळख प्रमाणित केली जाते. व्हीआयडी केवळ अल्प कालावधीसाठी वैध आहे. आधार पोर्टल किंवा एम-आधारवरून व्हर्च्युअल आयडेंटिटी मिळवता येते.(सौ. साम)