मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यातील काही बांधकामावर पालिकेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी जुहूमधील अधीश बंगल्यातील बांधकाम नियमित केले जावे, अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांची मागणी फेटाळून लावली आहे.
दरम्यान, नारायण राणे यांचा मुंबईतील जुहूमध्ये असणारा अधीश बंगला पालिकेच्या रडारवर आला होता. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिक बंगल्याची पाहणीदेखील केली होती. त्यानंतर या बंगल्यावर पालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. अखेर याप्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांनाही दणका दिल्याने हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.