कोच्ची, केरळ: आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' भारतीय नौदलात सामील झाली आहे, यामुळे भारताची सागरी ताकद वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमधील कोच्ची याठिकाणी एका कार्यक्रमात आयएनएस विक्रांतला हिरवा झेंडा दाखवला आणि ही युद्धनौका देशाला सुपूर्द केली आहे. भारताच्या सागरी इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे.
विक्रांत भारतीय नौदलात सामील झाल्यामुळे, भारत हा यूएस, यूके, रशिया, चीन आणि फ्रान्स यांसारख्या देशांच्या निवडक यादीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे स्वदेशी विमानवाहू जहाजाची रचना आणि निर्मिती करण्याची क्षमता आहे.
दरम्यान, विक्रांतवर असणाऱ्या रोटरी विंग विमानांमध्ये सहा पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर असतील, जे शत्रूच्या पाणबुड्यांवर विशेष नजर ठेवतील. MH-60R म्हणजेच रोमियो हेलिकॉप्टर अशा मल्टी-मिशन हेलिकॉप्टरसाठी भारताने अमेरिकेशी अलीकडेच करार केला आहे. भारताला यापैकी दोन (02) रोमियो हेलिकॉप्टर देखील मिळाले आहेत. याशिवाय शोध आणि बचाव मोहिमेत दोन टोही हेलिकॉप्टर वापरण्यात येणार आहेत. INS विक्रांतच्या कार्यान्वित झाल्यामुळे भारताला पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्टीवर विमानवाहू युद्धनौका तैनात करता येईल. यामुळे या प्रदेशात भारतीय नौदलाची सागरी उपस्थिती आणि क्षमता वाढली आहे.