नवी दिल्ली: तांदळाच्या वाढणाऱ्या किंमती पाहून केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकीकडे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्यात आले आहे. तसेच तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.सरकारी गोदामात असलेला तांदळाचा कमी साठा व लागवडीत झालेली घट आणि तांदळाच्या विक्रमी निर्यातीमुळे सरकारसमोर तांदळाच्या निर्यातीवर शुल्क लावण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
दरम्यान, सरकारी गोदामातील तांदळाचा साठा कमी होत असल्याने 80 कोटी नागरिकांसाठी असलेली मोफत धान्य योजना देखील संकटात सापडली असती.त्यामुळे तांदळाचे दर आणखी वाढू नयेत आणि देशांतर्गत पुरवठाही सुरळीत राहावा यासाठी सरकारनं बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क तर तुकडा तांदळावर निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.