मिरज: शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे साथ सोडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. या बंडखोर आमदारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं. त्यानंतर पुन्हा शिवसेनेतील काही आमदार दसरा मेळाव्याला शिंदे गटात सामील होणार असा दावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
शहाजी बापू पाटील म्हणाले, 'राजकारणात शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर , इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते'. 'तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांची एक निवडणूक फार गाजली होती. हे सुद्धा विसरता येणार नाही', असेही शहाजी बापू यांनी सांगितले. तसेच, शिवसेनेच्या ठाकरे गटातील आणखी काही आमदार दसरा मेळाव्याच्या शिंदे गटात येण्याची शक्यता आहे, असा दावा शहाजी बापू यांनी केला आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शहाजी बापू पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी शरद पवारांच्या राजकारणावर आणि शिवसेनेवर त्यांनी भाष्य केले.