मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच बालेकिल्ला भेदण्याचा नवा प्लान आखला आहे. राज्यातील मुंबई, ठाण्यासह अन्य महापालिका आणि नगरपालिका तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही रणनीती आखल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई, ठाणे यांसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. शिवसेनेनं थेट एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा गड भेदण्याची योजना आखली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठाणे शहरात जवळपास दोनशे कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. उपजिल्हा प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला असून, तोच भेदण्याचा चंग ठाकरे यांनी या माध्यमातून केलेला दिसत आहे, असे मानले जात आहे.