मुंबई: 'अतिशय व्यवस्थित प्रशासन सुरू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याला दोन-दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. सुप्रिया ताई, तुम्ही काळजी करू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सरकार पण चालवतील आणि फिरतीलही, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'राज्याला दोन मुख्यमंत्री पाहिजेत', अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. खासदार सुळे यांच्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तसेच पाटील पुढे म्हणाले, 'शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. इतकेच नाही तर बीए, बीएस्सी करून चालणार नाही. हे सामान्य ज्ञान आहे. बीएस्सीसोबत कौशल्य विकास केले पाहिजे. ज्यामुळे ज्ञान आणि कौशल्य वाढणार आहे. त्याचा फायदा तरुणांना रोजगारासाठी होणार आहे, याकडे मंत्री पाटील यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने परिसरातील किर्तनकारांचा जाहीर सत्कार सोहळा या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.