मुंबई - राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीची चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. यातच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुनही वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पटाील यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर याबाबत माहिती दिली. तसेच, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करताना एकप्रकारे दमच भरला. दसरा मेळाव्याचा विषय प्रलंबित असून आम्ही परवानगी मागितल्याचं पाटील यांनी सांगितलं.
गुलाबराव पाटील म्हणाले, “ते गोधडीत होतं, तेव्हा आम्ही शिवसैनिक होतो, तसेच, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहे. आदित्य ठाकरे हे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाहीत. आदित्य यांना एकट्याला आमदार होण्यासाठी दोन विधानपरिषद द्याव्या लागल्या आहेत. जर, तुम्हीच खरे वारसदार होता मग दोन एमएलसी का दिल्यात, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला. तसेच, आदित्या यांनी टिका करताना आमच्या वयाचा विचार करावा, नाहीतर आम्ही बोलण्यामध्ये एवढे कठीण आहोत की तुम्हाला आवरणार नाही, असा इशाराच पाटील यांनी दिला आहे.