नंदुरबार: आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मृत्युनंतर तब्बल ४२ दिवस मीठाच्या खड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर बलात्कार होऊनही तिचा खुन झाला असतांना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. शवविच्छेदन अहवालातदेखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणीच करण्यात आली नाही, त्यामुळेच या बापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. विवाहितने गळफास लावत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते, मात्र ही आत्महत्या नसून खून आहे, तसेच पीडितेवर बलात्कार झाल्याचा आरोपही तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह हा मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे.
दरम्यान, पीडितेला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुंबियांनी केला आहे. शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेत या प्रकरणातील संशयीत रणजीत ठाकरे याच्यासह तिघांना अटक केली. मात्र, मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असतांना पोलिसांच्या या भूमिकेचा पीडितेच्या वडिलांनी विरोध केला आहे. तिच्या वडिलांनी मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर मृतदेहाला अग्निडाग दिला परंतू त्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलींच्या मृतदेहाला पुरले आहे. या सगळ्या कठीणप्रसंगी खडक्याचे ग्रामस्थदेखील वळवी कुटुंबियांसमवेत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत.