मुंबई: महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अतिशय दुर्दैव आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळ्या पक्षानी एकत्रित येऊन काम केलं पाहीजे. महाविकास आघाडीमध्ये यातील काही लोक होते. महाराष्ट्र कधीच विसरणार नाही की साडे सात वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत होते. मुख्यमंत्री कॅबिनेट करायच्या वेळी सात वेळा दिल्लीला जाऊन आले. त्यामुळं आता तातडीने जावं आणि महाराष्ट्राची बाजू दिल्लीत मांडली पाहिजे. दुसरी ऑफर काही नसते. पंतप्रधान मेरिट बघतात. महाराष्ट्र पास झाला, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे',असे वक्तव्य त्यानी केले.
दरम्यान, पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवस तृतीयपंथीयांची राज्यस्तरीय परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ एकाच व्यासपीठावर होत्या. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुळे यांनी 'वेदांता' प्रकल्पावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला.