मुंबई: शिंदे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. आतापर्यंत एकही शेतकऱ्याला नुकसानभरपाईची मदत मिळाली नाही. महाराष्ट्रात कितीतरी घटना घडत आहे. मुख्यमंत्री विषय तिसरीकडेच घेऊन जात आहेत. जेव्हा पाहा तेव्हा ते सांगतात की मी ६ वाजेपर्यंत काम करतो. मी म्हटलं सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो तर हा माणूस उठतो कधी? आणि झोपतो कधी? असा टोलाही अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, 'आम्ही सरकारमध्ये असताना कॉंग्रेसच्या नेत्यांचे काही चुकलं तर सोनिया गांधींचा फोन आल्यावर लगेच ती चूक दुरूस्त व्हायची. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं चुकलं तर पवार साहेबांचा फोन यायचा, त्याचबरोबर शिवसेनेचं चुकलं तर उद्धव साहेबांचा फोन आल्यानंतर ती चूक दुरूस्त व्हायची. आता या दोघांच्या काळात (एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस) कुणी कुणाचं ऐकायलाच तयार नाही. ते 40 (शिंदे गटाचे आमदार) म्हणतात आम्ही सर्वच मुख्यमंत्री आहोत, अरे सर्वच मुख्यमंत्री म्हणजे अधिकाऱ्यांनी ऐकायचं कुणाचं? अधिकाऱ्यांना तर दमच देतात तुझी बदली करू, अधिकारी काय तुमचे घरगडी वाटले का'? असा प्रश्नही अजित पवार यांनी केला आहे.