मुंबई : आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर तोफ डागली. राज्यातून केवळ वेदांता हा प्रकल्पच पळवण्यात आलेला नाही, तर औषधांसाठीचा मोठा प्रकल्प ही पळविल्याचा आरोप माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
राज्यात येऊ घातलेला बल्क ड्रग्ज पार्क हा प्रकल्प ही राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प हातचा गेल्याचा त्यांनी आरोप केला. महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात होऊ घातला होता. पण हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
हा प्रकल्प हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशात होऊ घातलेला आहे. औषधी पार्कची योजनाही राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याबाहेर गेल्या. याशिवाय, बल्क ड्रग्ज प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने जागा ही मंजूर केली होती. या प्रकल्पासाठी अडीच कोटींची सबसिडीही दिली होती. या प्रकल्पामुळे राज्यात तीन लाख युवकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तसेच, राज्यात 394 फार्मसी कॉलेज आहेत. लस विकसीत करण्यातही राज्य आघाडीवर आहे. याप्रकल्पाचा मोठा फायदा राज्याला झाला असता. पण राज्य सरकारचं या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.