मुंबई: आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
तसेच, यावर्षी शेतकऱ्यावर निसर्गाने अवकृपा केली. राज्यातील विदर्भ, मराठावड्यासह काही भागात अतिवृष्टी झाली, त्यात शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तूर, मका, बाजारी पिकं हातातून गेली. फळबागा व पालेभाज्यांनाही या पावसाचा फटका बसला, पशुधनाचेही नुकसान झाले. राज्य सरकारने मंत्रालयात बसून पंचनामे करण्याचे आदेश दिले, पण स्थानिक पातळीवर प्रशासन कामच करत नसल्याचे चित्र आहे.
याशिवाय, काँग्रेस पक्षाने याधीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती; पण राज्यातील ईडी सरकारने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले. आताही परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची यंदाची उरलीसुरली स्वप्नेही धुळीस मिळवली आहेत. पण सरकारला त्यांच्यातील भांडणातूनच वेळ मिळत नाही. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून सरकारने लवकारत लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.