रत्नागिरी: शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. हे दोन्ही मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, शिंदे गटाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच रामदास कदम यांनी आश्चर्य करणारे विधान व्यक्त केले आहे.
रामदास कदम म्हणाले, “दोन ठिकाणी वेगळा मेळावा होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे आपण समाधानी नाही. पक्ष उभा केलाय. केसेस घेतल्या आहेत. सगळं आपण भोगलंय. त्यामुळे दुःख होत आहे, अशी वेदना रामदास कदम यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. त्याचं आपल्याला दुःख झालंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.