मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेचं निवडणूक चिन्ह चाळीस डोक्याच्या रावणाने गोठवलं. उलट्या काळजाची माणसे आणि कंपू फिरतोय. त्यांनी कट्यार आईच्या काळजात घुसवली. याचा आनंद त्यांच्या महाशक्तीला झाला असेल, अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
तसेच ते पुढे म्हणाले, 'सध्या शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. आणीबाणीच्या काळातही हे झालं नव्हतं. इंदिरा गांधींकडे तेव्हा प्रस्ताव गेला होता, शिवसेनेवर बंदी घाला. परंतु त्यांनी शिवसेनेवर बंदी घातली नाही. मात्र तुमच्या कृतीतून तुमचा हेतू आता स्पष्ट झाला आहे, तुम्हाला शिवसेना संपवायची आहे. कॉंग्रेसने जे केलं नाही ते तुम्ही करु दाखवलं आहे, असेही उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केले.