पुणे: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अशातच आता शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
“शिवसेना संपवायला जबाबदार शरद पवार आहेत, सगळा दोष पवार साहेबांचा आहे. 2014 ला शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. तो कट होता. पवार साहेबांना शिवसेना-भाजपचा संसार चालू द्यायचा नव्हता. शरद पवारांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पवारांचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राजकीय मतभेद होतेच, 2019 ला एका खुर्चीच्या मोहापाय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाऊन बसले. मात्र शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले अशी टीका शिवतारेंनी केली.