सांगली : सांगलीच्या दत्त इंडिया या खाजगी कारखान्याने एक रकमी 2961 रुपये देण्याचे जाहीर करून सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे. हे स्वाभिमनीच्या आंदोलनाचे यश आहे. त्याचा आदर्श क्रांती, राजारामबापू, सोनहिरा, विश्वास, श्री.श्री. रविशंकर या कारखान्यांनी घेवून एक रकमी एफआरपी जाहीर करावी अन्यथा धूराडे पेटू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
खराडे म्हणाले, शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाण्यानी एक रकमी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीही कोल्हापूर जिल्ह्यात एक रकमी एफआरपी दिली होती. मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली नव्हती. यंदाही सहकारी साखर कारखाने एक रकमी एफआरपी देण्याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत दत्त इंडिया अर्थात वसंतदादा कारखान्याने गत वर्षी 2851 रुपये दर दिला होता त्यात 110 रुपयाची वाढ करून एक रकमी दर जाहीर केला आहे हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे.
सांगली जिल्ह्यात राजारामबापू कारखान्याचे सर्वोदय, साखराळे, वाटेगाव आणि जत अशी चार युनिट आहेत. क्रांती, सोनहिरा, उदगीरी, हुतात्मा, विश्वास, निनाई, रविशंकर, मोहनराव शिंदे आदी 12 कारखाने सुरू आहेत या कारखान्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही.
गाड्या अडवणे, कारखाने बंद करणे, टायर फोडणे आदी करण्याची वेळ साखर सम्राटांनी आमच्यावर आणू नये. येत्या चार दिवसांचा अल्टिमेट आम्ही कारखानदारांना देत आहोत. अन्यथा पाच तारखे पासून जिल्ह्यात ऊस तोडी बंद, गाड्या अडवणे सुरू करण्याचा इशारा देत आहोत. साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या सहन शक्तीचा अंत बघू नये. शेतकरी अगोदरच अती पावसामुळे मेटाकुटीला आला आहे. ऊस वगळता अन्य पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर एक रकमी एफआरपी जाहीर करावी. अन्यथा परिणामास सामोरे जावे असा इशारा खराडे यांनी दिला आहे.