म्हसवड/अहमद मुल्ला : दिवाळी सणा निमित्त राज्य सरकारने तालुक्यात हरभरा डाळ, रवा, साखर व गोडेतेल या चार वस्तूंचा समावेश असलेला "आनंदाचा शिधा" किटचे वाटप माण तालुक्यातील 31 हजार 217 शिधा पत्रिका धारकांना 139 रेशनिंग दुकानातून सुरु असल्याची माहिती खटाव माण चे प्रांत अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी दिली.
दिवाळी सणा पुर्वी "आनंदाचा शिधा" वाटप करण्याचे सरकारचे धोरण होते परंतू काही अडचणीमुळे या वस्तू वेळेत उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. प्रारंभी रवा, हरभरा डाळ व गोडेतेल या तीन वस्तू उपलब्ध झाल्या व त्यानंतर काल (ता.27) साखर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ज्या तीन वस्तू प्रथम उपलब्ध झाल्या त्याचे वाटप तातडीने सुरु केले गेले व त्यानंतर साखर वाटप करण्याची कार्यवाही सुरु केली गेली आहे.
माण तालुक्यात दहिवडी व म्हसवड येथे शासकिय धान्य साठवणूक गोडावून आहेत. या गोडावून मधून दहिवडी भागातील 77 सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून 19 हजार व 327 शिधा पत्रिका धारकांना किट उपलब्ध झाले असुन त्यापैकी 17 हजार 295 ग्राहकांना किट वाटप केले गेले असुन उर्वरित दोन हजार 32 किटचे वाटप केले जाणार आहे.
म्हसवड भागातील 62 स्वस्त धान्य दुकानातून 11 हजार 890 शिधा पत्रिका धारकांना किट उपलब्ध झाले असुन त्यापैकी 11 हजार 85 किटचे वाटप केले गेले आहे. उर्वरित 835 ग्राहकांना किट वाटपाची कार्यवाही सुरु आहे. दहिवडी विभागातील 15 व म्हसवड भागातील पाच स्वस्त धान्य दुकानास किट पुरवठा करण्याची कार्यवाही विलंबाने सुरु असल्याची माहिती श्री.सुर्यवंशी यांनी दिली.
दिवाळी निमित्त “आनंदाचा शिधा” किट वाटप राज्य सरकारकडून थेट करण्यात येत असुन या किट वाटपास मशीनवर अंगठा देण्याची ग्राहकांना गरज भासणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. माण व खटाव तालुक्यातील सर्व शासकिय स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर ज्या ग्राहकांना धान्य व इतर वस्तू केंद्र सरकारतर्फे वाटप केले जाते आहे या वस्तु घेण्यासाठी संबंधित शिधापत्रिका धारकांनी धान्य वितरण दुकानात उपलब्ध करुन दिलेल्या मशीनवर अंगठा स्कॅन करु वाटप ऑनलाईन नोंद करणे सरकारने बंधनकारक केले आहे.
अनेक स्वस्त धान्य दुकाने ग्रामीण व दुर्गम भागात आहेत. त्या भागात मोबाईल टॉवरची रेंज नसल्यामुळे ऑनलाईन नोंदी करुन धान्य वेळेत वाटप करणे शक्य होत नसल्याची तक्रारी स्वस्त धान्य दुकानदाराकडून केल्या जात आहेत. या बाबतची कल्पना वरिष्ठांना वेळोवेळी दिली असल्याचे श्री सुर्यवंशी यांनी सांगितले.