शिंदे-फडणवीस सरकारचे आयुष्य काही दिवसांपुरतेच
शरद कोळी : आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे आयुष्य हे आता काही दिवसांपुरतेच उरले आहे. आता इथून पुढच्या काळात शिंदे गटाचे सर्व आमदार हे माजी आमदार म्हणूनच राहतील, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे युवा राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केला आहे. त्यांनी विटा येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासह उबाठा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संस्ख्येने उपस्थित होते.
यावेळी कोळी म्हणाले, या येथील आमदार आणि त्यांचे बगलबच्चे म्हणतात की, आम्ही शिवसेनेच्या मतांवर आमदार झालेलो नाही. पण त्यांना मला विचारायचं आहे की, २०१४ ला शिवसेनेत येण्यापूर्वी तुम्ही दहा वर्षे आमदारकीसाठी झटत होतात, पण त्यात तुम्हाला यश का आले नाही? शिवसेनेत येण्यापूर्वी सुद्धा तुमचा गट होताच ना? तरीही तुमचा दहा वर्षे म्हणजेच सलग दोन वेळा पराभव झाला होता. तुम्ही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उमेदवारी दिल्यानंतरच तुम्ही आमदार झालेला आहात हे विसरू नका. तरीही तुम्ही शिवसेनेला विसरलात.
ज्या उध्दव ठाकरेंनी तुम्हाला यश दाखवलं, त्यांच्याशी गद्दारी केलीत. पण लक्षात ठेवा हे जनतेला हे मुळीच आवडलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात तर पुढच्या ५-६ दिवसांत निर्णय येणार आहे. तुम्ही माजी आमदार होणारा आहात. तुमच्यावर सहा वर्ष अपात्रतेचे सावट आहे. आगामी काळात जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पुढचा आमदार हा शिवसेनेचाच म्हणजे महाविकास आघाडीचाच असेल असेही कोळी म्हणाले.