दोन्ही मुलांसह विवाहितेची आत्महत्य प्रकरण : पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : शहरात विजापूर रस्त्यावरील राजस्व नगरात राहत्या घरात स्वतःच्या दोन्ही चिमुकल्या मुलांचा खून करून मातेने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेप्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर स्वतःच्या मुलांची हत्या केल्याबद्दल मृत ज्योती हिच्या विरूध्द ही गुन्हा नोंद झाला आहे.
ज्योती सुहास चव्हाण वय २७) व तिचा मुलगा अथर्व (वय साडेतीन वर्षे ) व मुलगी आर्या (वय दोन वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. मृत ज्योती हिचे वडील दिलीप व्यकंटराव गायकवाड (रा. मुरूम, ता. उमरगा,जि. धाराशिव, सध्या रा. बालसाड, गुजरात) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती हिचा पती सुहास कैलास चव्हाण (रा. राजस्व नगर, विजापूर रस्ता, सोलापूर), दीर सुशांत चव्हाण सासू मंगल चव्हाण, जाऊ रेखा सुशांत चव्हाण आणि नणंद सैनू लक्ष्मण जाधव (सर्व रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.
मृत ज्योती हिचा विवाह २०१७ साली एसटी महामंडळात नोकरी करणाऱ्या सुहास चव्हाण याजबरोबर झाला होता. परंतु ज्योती हिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेऊन सासरची मंडळी तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करीत असे. तिला सतत मारझोड व्हायची. सुहास आणि ज्योती दोघेही कोंडी येथून सोलापुरात राजस्व नगरात भाड्याच्या घरात मुलांसह राहू लागले असतानाही तिचा छळ सुरूच होता.
घटनेच्या दिवशी सकाळी सुहास हा नोकरीवर जाण्यापूर्वी त्याने ज्योती हिला भांडण काढून मारहाण केली होती. मुलगा अथर्व याने स्वतः ही गोष्ट आजोबा दिलीप गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे सांगितली होती. सततच्या छळास वैतागून ज्योती हिने चिठ्ठी लिहून आपल्या दोन्ही मुलांसह स्वतः आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.