महाराष्ट्रात 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे अवघड : शिक्षणमंत्री
मुंबई : राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करता येतील का? याबाबत शिक्षण विभाग आणि संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिलाय. म्हणून आता दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबत एसओपी (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडली आहे.
दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी केली. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज