माणदेश एक्सप्रेस न्युज
जत : जत -विजापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व स्विप्ट गाडीच्या अपघातात बनाळी व जत येथील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर १० वर्षाचा मुलगा सुदैवाने या अपघातात बचावला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जतपासून काही अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्यानजीक हा अपघात झाला.
या अपघातामध्ये नामदेव गुणाप्पा सावंत (वय ६५), पद्मिनी नामदेव सावंत (वय ६०), श्लोक आकाशदिप सावंत (वय ८), मुयरी आकाशदिप सावंत, (वय ३८,सर्व जण रा बनाळी, सध्या जत) दत्ता हरिबा चव्हाण (वय ४० रा.जत) हे पाचजण ठार झाले आहेत. तर वरद सावंत (वय १०) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी, बनाळीचे असलेले सावंत कुटुंब जत येथे वास्तव्यास आहे. सुट्या असल्याने कुंटुबातील पाच जण स्विप्ट गाडीने देवदर्शनासाठी गेले होते. ते आज सकाळी परत जतकडे येत असताना विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर अमृतवाडी फाट्यानजीक एका मालवाहतूक ट्रकने स्विप्टला धडक दिली. या धडकेत स्विप्ट गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला असून एक दहा वर्षाचा मुलगा सुदैवाने या अपघातात बचावला असून तोही गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी तातडीने जत पोलीसांनी पोहचत मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.पुढील तपास सुरू आहे.