पुणे : विधान परिषदेच्या ५ जागांवर येत्या १ डिसेंबरला निवडणुका होणार आहेत, यात पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीत रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली होती. परंतु भाजपाला मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेची समजूत काढण्यात यश आलं आहे.
याबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले की, भाजपाचे घटकपक्ष म्हणून आम्ही भाजपासोबत आहोत, आम्ही समाधानी आहोत, निश्चित यापुढेही भाजपासोबत चांगले काम करू, पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होईल असं कृत्य रयत क्रांती संघटना करणार नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे उमेदवार प्रा. एन. डी चौगुले यांनी पुण्यातून अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, रयत क्रांती संघटनेचा योग्य तो सन्मान राखला जाईल, दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने विचार वेगळे असतात. प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र ही निवडणूक महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांविरोधात लढायची आहे. त्यामुळे भाजपाचा उमेदवार मागे घेण्याचा प्रश्न नव्हता. घरात भांडणं होत असतात म्हणून नाराज व्हायचं नसतं असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची समजूत काढली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज