कोल्हापूर: जोरदार वारे आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने काल, गुरुवारी संध्याकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला तासभर झोडपून काढले. काल सायंकाळपासून सुरु झालेल्या पावसाची आजही रिपरिप सुरुच आहे. या पावसाने मात्र उष्म्यापासून सुटका केली असून, शेती कामांनाही गती आणली आहे.
दोन दिवस वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. गुरुवारी पहिल्यादिवशीच अंदाज खरा ठरला. दरम्यान, दिवसभर आभाळ काळ्या ढगांनी भरलेलेच होते. संध्याकाळी पाचच्यासुमारास जास्तच काळवंडून आले, वारे सुटले आणि सहा वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. आलेल्या या सरीमुळे लोकांची पळापळ झाली. आडोसा मिळेल तिथे लोक थांबले. पावसामुळे शहरात पाण्याचे लोट वाहू लागले. बऱ्याच सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले. शहरात पावसाने जशी त्रेधातिरपीट उडवली तशीच ती ग्रामीण भागातही होते. या पावसामुळे खरिपाच्या मशागती व पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
मान्सूनची चाहूल
अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. केरळला तो २७ मे पर्यंत दाखल होणार आहे. कोकण व कोल्हापुरात तो ३ जूनपर्यंत येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आजही पाऊस बरसणार
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवारीदेखील वादळी पाऊस बरसणार आहे. पुढील सोमवारपर्यंत जिल्हयात अंशता ढगाळ वातावरण राहणार आहे.