जालना : मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा आजचा दूसरा दिवस आहे. आज देखील ते केवळ दोन घोट पाणी पिऊन आहेत. दरम्यान, त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकास जरांगे यांनी परत पाठवले.मराठा आरक्षण हाच उपचार आहे, सरकारकडून आरक्षणाशिवाय काहीच घेणार नाही,असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
राज्य सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरू झाले आहे. तसेच राजकारण्यांना गावबंदी देखील करण्यात आल्याने आंदोलनाची तीव्रता व्यापक प्रमाणात दिसून येतेय.दरम्यान, मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणादरम्यान पाणी देखील पिणार नाही हे जाहीर केले.
बुधवारी छत्रपती संभाजीराजे यांच्या विनंतीवरून त्यांनी पाण्याचे दोन घोट प्राशन केले. आज देखील त्यांनी केवळ दोन घोट पाणी पिले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये बदल दिसून येत असल्याने आज दुपारी शासनाचे वैद्यकीय पथक तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले. मात्र, जरांगे यांनी तपासणीस नकार देत पथकाला परत पाठवले.