पुणे : जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचा खंड, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मातीतील आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या घटकांचा एकत्रित विचार करून राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील २४ तालुक्यांमध्ये गंभीर; तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदरमध्ये गंभीर आणि दौंड, इंदापूर, शिरूर या तीन तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.
दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या तालुक्यांमध्ये सवलती लागू करण्यास राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा निकष लागू झाला.
त्याचप्रमाणे पीक निर्देशांक व जमिनीतील आर्द्रतेचा निर्देशांक या निकषांचा आधार घेत राज्यातील १५ तालुक्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा यासाठी कृषी आयुक्तांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले.
याप्रकरणी पुढील कार्यवाही करून त्याचा अहवाल विभागात सादर करण्यात यावा. दुष्काळ घोषित केल्याचे आदेश शासन निर्णयाच्या दिनांकापासून अंमलात येतील व हे आदेश राज्य सरकारने रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील, असेही त्यात नमूद केले आहे.
संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे व त्यांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणाव्यात, असेही नमूद केले आहे.