माणदेश एक्सप्रेस न्युज/सांगली/प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी बोरगाव (ता . तासगाव) येथे ऊस, द्राक्ष, बेदाणा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. ही परिषद सायकाळी पाच वाजता सुरू होणार असून परिषदेला माजी खा. राजू शेट्टी व स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, सावकार मदनाईक आदी उपस्थित राहणार आहेत.
ऊसाला पहिली उचल 3500 रुपये मिळाली पाहिजे, गत वर्षीचा दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, वजनातील काटामारी थांबलीच पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत, ड्रायव्हर ची एन्ट्री थांबली पाहिजे, साखर उताऱ्यातील चोरी बंद झाली पाहिजे.
तसेच द्राक्ष दलालालाची नोंदणी सक्तीने झाली पाहिजे, द्राक्ष व बेदाण्याचा खप वाढविण्यासाठी द्राक्ष बेदाणा खाणे कसे फायदेशीर आहे हे सांगणारी जाहिरात टी व्ही वर सुरू करावी, द्राक्ष बेदाणा महामंडळाची निर्मिती करावी, बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यास स्वाभिमानी ने भाग पाडले त्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे द्यावेत, बेदाण्याचे पेमेंट 21 दिवसा पेक्षा उशिरा झाल्यास 2 टक्के व्याजा सहित मिळावे, 50 हजार प्रोत्साहन अनुदान तातडीने मिळावे, गायीच्या दुधाचा हमीभाव 60 रुपये करावा आदी मागण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेचे आयोजन बोरगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, धोडिराम पाटील, रवी पाटील, प्रतीक पाटील, महादेव पवार, सागर पाटील, शाम पवार, महादेव दीक्षित आदीसह स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत.