माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : राज्य शासनाने राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी जाहीर केली असून यामध्ये ‘कायमस्वरूपी दुष्काळी’ तालुका अशी गणना असणाऱ्या आटपाडी तालुक्याचा मात्र दुष्काळी तालुक्यात समावेश केला नसल्याने, आटपाडी तालुक्याचे राजकारण करणारे प्रस्थापित पुढारी कोठे आहेत असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शेखर निचळ यांनी केला आहे.
राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मध्यम दुष्काळ असणारे तालुके म्हणून शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचे दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले आहेत.
परंतु सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुके म्हणून आटपाडी, जत, कवठेमहांकाळ ह्या तालुक्यात मात्र मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला नसल्याने सरकारचे डोके तर ठिकाणावर आहे का अशी शंका येत असल्याने यामध्ये प्रामुख्याने आटपाडी तालुक्याचे राजकारण करणारे प्रस्थापित पुढारी कोठे आहेत असा सवाल ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी केला असून याबाबत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी माणदेश एक्सप्रेसशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.