पुणे: सण आणि उत्सवात ‘होऊ द्या आवाज’ म्हणत मोठमोठ्या आवाजात डीजे लावले जातात आणि मोठा आवाज करणारे फटाके उडवले जातात; पण हाच क्षणाचा आनंद आयुष्यभराचे दु:ख देऊ शकतो. स्वत:सह इतरांच्या आरोग्याच्या मुळावर उठू शकतो, याचे भानही कार्यक्रमांच्या आयोजकांना राहत नाही, असे मत सजग पुणेकर व्यक्त करीत आहेत.
गणेशोत्सवासह नवरात्र आणि लग्नसमारंभात डीजेंचा दणदणाट आणि दिवाळीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी यामाध्यमातून होणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. पुण्यात वायुप्रदूषणाबरोबरच वाढत्या ध्वनिप्रदूषणाने पुणेकर मेटाकुटीला आले आहेत. हे थांबविणार कोण आणि कसे? हा खरा प्रश्न आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांमध्ये आवाजाची पातळी किती असावी याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत; पण सध्या हे आदेशही धाब्यावर बसविले जात आहेत. मुख्यमंत्री यांनी सण, उत्सव साजरे करण्याची मुभा दिल्याने यंदा गणेशोत्सव, नवरात्र हे दोन्ही उत्सव दणदणाटात साजरे झाले. विसर्जन मिरवणुकीत या सगळ्यांनी कळस गाठला होता. डीजेच्या दणदणाटामुळे लोकांच्या घरातील खिडक्यांच्या काचा हलायला लागल्या होत्या.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी नवरात्रीच्या तोरणांच्या मिरवणुकांवर बंदी घातली होती. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात पोलिसांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. तशाच कडक नियमांची व अंमलबजावणीची अपेक्षा पुणेकर करीत आहेत. पुणेकरांचे आरोग्य धोक्यात घालून सण-उत्सव साजरे करणार का? इतरांना त्रास होऊ न देता ते साजरे करण्याचा समंजसपणा पुणेकर दाखविणार? हा खरा प्रश्न आहे.